Sunday, July 1, 2018

तुळजापूर ( Tuljapur places to visit )

तुळजापूर

तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.

तुळजापूरची तुळजाभवानी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो.देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

तुळजापूर येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-

काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.

आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.

घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?.’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.

पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे.

रामवरदायिनी -येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला. याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.

भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.

गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.

नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.

मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे.

धाकटे तुळजापूर:-- येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासूनप्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानीतलवार दिली होती.

कसे जाल :

जरी हे ठिकाण ऊस्मानाबाद जिल्हा त येत असले तरी तेथे जाण्यासाठी सर्वात जवळचे व सोईस्कर ठिकाण सोलापूर आहे . सोलापुर हे रस्ते व लोहमार्गाने पुणे / मुंबई स जोडले गेले आहे . येथुन सोलापूर ला जाण्यास राज्य महामार्ग परीवाहन मंडळाच्या साध्या , निमआराम तसेच वातानुकुलित बसची व्यवस्था आहे . तसेच पुणे येथुन सोलापूरला जायला अनेक रेल्वे २४ तास ऊपलब्ध आहेत . स्वतःचे वाहन असल्यास पुण्यातुन तुळजापूरला ६ तासात रस्ता मार्गे जाता येते . सदर मार्गावर ४ते५ ठिकाणी टोल दयावा लागतो .

तुळजापुर ऊस्मानाबाद महाराष्ट्र गुगल पिन .

https://goo.gl/maps/G81CbqGry2y

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. (IST +5:30 GMT)
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
https://mobile.twitter.com/Shailesh1881975


माहितीचा स्त्रोत: - इंटरनेट

No comments:

Post a Comment