Saturday, February 23, 2019

जागतिक आश्चर्यचा ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प....


 जागतिक आश्चर्यचा ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प....


जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार जलाशय, पायाखाली जाणवणारी पानगळीची रेलचेल, ठायी ठायी आढणारे वन्य प्राणी.. श्वासाला चिरत जाणारी नीरव शांतता आणि ऊंच आकाशाला आपल्या कवेत घेऊ पाहणारे आणि दाटीवाटीने उभे असलेले हिरवेगार वृक्ष... ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे “जंगलच्या राजा” चे साम्राज्य. तांबड्या मातीवरून चालत जात असतांना जागोजाग जाणवणारी उत्कंठा आपल्याला शांत राहू देत नाही. आपली नजर सतत शोध घेत असते पाणवठ्यावर जाणवणाऱ्या हालचालीचा.. हा कानोसा घेत असतांनाच जर “वाघोबां”चे दर्शन झाले तर अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि तो थरार बरंच काही सांगून जातो...

जागतिक आश्चर्य

वाघ तसा एकट्याने रहाणारा प्राणी . वाघ एका विशिष्ठ वया नंतर स्वतंत्र शिकारीचे क्षेत्र स्थापन करतो . यात तो इतर दुसऱ्या वाघाची घुसकोरी सहन करत नाहि . प्रसंगी त्या दोन वाघात झडप होते व घुसकोरास बाहेर हाकलले जाते . एकमेकांची भावंडे असलेले वाघ पण स्वतःचे शिकार क्षेत्र तयार करून दुसऱ्या भावंडास हि तेथे प्रवेश करता येत नाहि . वाघांच्या या स्वभावा विपरीत ताडोबा येथे ४ भावंडे एकत्र फिरताना व शिकार करताना दिसतात  पुर्ण जगात असे दुसरे उदाहरण नाहि .

ताडोबा, ३१ मार्च १९५५ रोजी घोषित झालेले हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याचे क्षेत्रफळ ११६.५५ चौ.कि.मी. भोवताली ५०९.२७० चौ.कि.मी चे जंगल असल्याने २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा सर्व परिसर संरक्षित होऊन अंधारी प्रकल्पाची निर्मिती झाली...
येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले तर अंधारी वन्यजीव अभयारण्याला या अभयारण्यातून प्रवाहित होणाऱ्या अंधारी नदीवरून नाव देण्यात आले.
वाघांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाल्यानंतर भारतात व्याघ्र संरक्षणासाठी प्रयत्न सुरु झाले. वाघांच्या शिकारीवर बंदी आली. पाठोपाठ वाघांच्या कातडीच्या विक्रीवरही बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार होऊन व्याघ्र प्रकल्पाचा विशेष दर्जा निर्माण झाला. त्यात महाराष्ट्रातील मेळघाट जंगलाचा समावेश होता.

कालांतराने ताडोबा आणि अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र प्रकल्पातील एकूण ६२५.४० चौ. कि.मी च्या संरक्षित क्षेत्रास “गाभा (कोअर) क्षेत्रा”चा दर्जा असून भोवतालचे ११०१चौ. कि.मी चे क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे.

समृद्ध वनसृष्टी

येथील जंगल हे प्रामुख्याने कोरड्या पानगळीचे आहे. ते दक्षिण उष्णकटिबंधीय पाणझडीचे वन या प्रकारात मोडते. सागवान आणि बांबूच्या झाडांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. 
अर्जन, धावडा,करई, तेंदू, मोह, कुंभा, पळस, बहावा, रोहीण, कुसूम, बेहडा, आवळा,जांभूळ, आंबा, उक्षी या प्रमुख वृक्ष प्रजातीही येथे पहावयास मिळतात.

हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते. शिशिरातील पानगळ,वसंतातील मोहर असा ऋतूबदल येथेही प्रकर्षाने जाणवतो. पळस,पांगारा, कुंभा वृक्षांची मनोहारी रंगी बेरंगी फुलं मन हरखून टाकतात.आसमंतात मोहाचा सुगंध दरवळत असतो. ग्रीष्माची चाहूल लागताच वाढत्या उष्म्याने बहावा, अर्जन सलई, गुलमोहर सारख्या वृक्षांना बहर येतो. पानगळीने सांगाडे झालेल्या वृक्षांवर नवी कोवळी उमलती डोके वर काढू लागते. आयुष्याच्या रहाटगाड्यातील बालपण, तारूण्य आणि वार्धक्याच्या सगळ्या अनुभूती या वृक्षांनाही न चुकल्यासारख्या वाटतात आणि वास्तवादी आयुष्याचे दर्शन होऊन पाय जमीनीवर राहण्यास मदत होते.

वन्यप्राण्यांचे वैविध्य

वन्य प्राण्यांच्या “सहज” दर्शनासाठी ताडोबा विशेष उल्लेखनीय आहे.पट्टेवाला वाघ हे या जंगलाचे वैशिष्ट्य. येथे वानर, रानडुक्कर, चितळ,सांबर, गवे यांचे मोठमोठाले कळप दिसून येतात. जगातील सर्वात मोठा वन्यबैल म्हणून ज्याला संबोधलं जातं असा गवा येथे आहे. शिंगाच्या दोन जोड्या डोक्यावर घेऊन मिरवणारा चौसिंगा येथे आहे. ऊंच उडणारा सारस, सर्वात वेगाने उडणारा बहिरी ससाणा, जगातील सर्वात मोठे शृंगी घुबड, जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा किडा “सन स्पायडर”, जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलस, जगातील सर्वात मोठे जाळे विणणारा “वृक्ष कोळी”ही येथे आहे. याशिवाय भित्रे भेकर, वाळवी-किडे खाण्यात मश्गुल असणारे अस्वल आणि शिकारीच्या प्रयत्नात असलेली रानकुत्रीही आपल्याला भेटतात. अत्यंत रुबाबदार असलेल्या बिबळ्याचे दर्शनही येथे सहजगत्या होते. याशिवाय चांदी अस्वल, रान मुंगूस,तुरेवाला सर्प गरूड, तीसा, मधळ्या गरूड, मगर, घोरपड, रान सरडा,राखी रानकोंबडा, टकाचोर, उदमांजर, रानमांजर, सायळ, ससा, उडणारी खार असे प्राणीही आपल्याला भेटतात.

पक्ष्यांच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे भूतलावरचा स्वर्गच आहे. मोर, तुरेवाला कोतवाल, हळद्या, स्वगीय नर्तक,
 हरेल, रातवा,नवरंग, नीळकंठ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, मत्स्य गरूड, यासारख्या अनेक पक्षांनी हे जंगल समृद्ध आहे. अनेकदा दुर्मिळ गिधाडांचेही येथे दर्शन होते. याशिवाय अनेक रानपक्षी आणि जलपक्षी यांचे हिवाळ्यातील वास्तव्य आपले लक्ष्य वेधून घेते.
ताडोबा अंधारी प्रकल्प हे खरं तर वाघांचे साम्राज्य असलेली भूमी. येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत, जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे आहेत. त्यामुळे हे जंगल वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास असलेले जंगल समजले जाते. म्हणूनच यावर्षी भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्स इन इंडिया बाबत २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी राखीवला “व्हेरी गुड” तर सह्याद्री व्याघ्र राखीवला “गुड” वर्ग मिळाला आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे निव्वळ वाघांचे जंगल नाही येथे वाघांसह सस्तन प्राण्यांच्या ४१ जाती आहेत शिवाय पक्ष्यांच्या जवळपास २९० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३० जाती, अष्टपाद प्राण्यांच्या ३५ जाती तर ७५ प्रकारच्या प्रजातींचे फुलपाखरंही येथे आहेत. जवळपास २० जातींचे मासे, असंख्य जातींचे कीटक आणि विविध प्रजातींच्या वनस्पतींनी हे जंगल संपन्न आहे.

येथे जाण्यापूर्वी...

निसर्ग ही आपल्यासाठी सर्वात मोठी शाळा आहे, तेथे आपण बरच काही शिकू शकतो. या निसर्गाचे अस्तित्व टिकून राहिले तरच आपलेही अस्तित्त्व अबाधित राहणार आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कृतीने या निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेला हा समृद्ध वारसा आपल्या पुढच्या पिढीलाही असाच संपन्न अवस्थेत हाती देता यावा यासाठी प्रत्येकाने जंगलात जाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. असे केल्यास जंगलात नैसर्गिक अवस्थेत हे प्राणी कसे जीवन जगतात, कसे राहातात याचा निखळ आनंद आपण घेऊ शकतो. संयम आणि शिस्त या दोन गोष्टींची शिदोरी बरोबर घेऊन गेल्यास आणि शांतपणे वनविहार केल्यास वन्यप्राणी हमखास दिसून येतात.

निवास व्यवस्था :

मोहर्ली आणि कोलारा येथे वन विकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल आहे. आरक्षणासाठी (www.fdcm.nic.in) वर संपर्क करावा.याशिवाय मोहर्ली येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकूल आहे. 

आरक्षणासाठी(www.maharashtratourism.gov.in)  संपर्क करावा. मोहर्ली आणि कोलारा येथे खाजगी पर्यटक निवासही उपलब्ध आहेत.

प्रवेश : मुख्य प्रवेश मोहर्ली येथून आहे. त्याशिवाय कोलारा, झरी आणि पांगडी येथूनही प्रवेश दिला जातो.

कसे पोहोचाल :

विमान - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर १५५ कि.मी
रेल्वे - चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य मार्ग) ४५ कि.मी
रस्ता - चंद्रपूर- ४५ कि.मी, चिमूर- ३२ कि.मी

ताडोबा अंधारी प्रकल्पाचे. प्रमुख द्वार मोहर्ली ची गुगल पिन






ताडोबा अंधारी प्रकल्पाचे वर्णन करणारी युट्युब्  क्लिप


विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .   
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 
संदर्भ :- लेख मा . मंत्री सुधिर मुंगंटिवार यांच्या ब्लॉग वरून साभार , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

Friday, February 22, 2019

या उन्हाळ्यात चला जंगलात वाघ पहायला !



या उन्हाळ्यात चला जंगलात वाघ पहायला !


कुठल्याहि जंगलाची समृद्धी हि तेथिल असणाऱ्या वाघांच्या संखेवर ठरवली जाते . जंगलाच्या अन्नसाखळीत वाघ हा शिरोमणी आहे . जितके वाघ जास्त तितके त्यांचे भक्क्ष प्राण्यांची संख्या जास्त असते व त्यामुळे या भक्क्षांना आवश्यक गवत व वृक्षसंपदेच्या बाबत जंगल संमृद्ध असते . साधारणतः आपण पावसाळा संपला की जंगल पर्यटनास जातो . परंतु यासाठी अत्यंत उत्तम कालावधी हा एप्रिल व मे महिना आहे . महाराष्ट्रात या महिन्यात प्रचंड उन्हाळा असतो . अनेक ठिकाणी जलस्त्रोत अटल्यामुळे दुष्काळ सुरू असतो व त्यामुळे पाणी असलेल्या शहरांत गावांतून स्थलांतर वाढते . हिच गोष्ट जंगलाला लागु होते . वाघाचा संचार साधारणतः १५० वर्ग किलोमिटर असतो . त्यामुळे वाघ दिसणे तसे दुर्मिळच . त्यात हिवाळ्यात जंगलात छोटे मोठे जलस्रोत अनेक ठिकाणी असल्याने त्यामुळे प्राणी विखुरलेले असतात व त्याचा परिणाम वाघ पण खुप मोठ्या परीसरात फिरुन शिकार करत असल्याने त्यांना शोधणे कठिण होते . उन्हाळ्यात सर्व छोटे जलस्रोत आटून गेलेले असतात संपुर्ण जंगलातील प्राण्यांना मोठ्या जलस्त्रोतांशिवाय पर्याय नसतो . त्यामुळे अश्या ठिकाणी शिकार व त्यांचे शिकारी वाघ जमा होतात व वाघ दिसण्याची शक्यता वाढते . महाराष्ट्रात एकुण ६ व्याघ्र प्रकल्प आहेत पुढिल काहि लेखांत आपण त्यांची सविस्तर माहिती घेवू .
भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या ३८ वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे.
स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या याच अहवालानुसार महाराष्ट्रात २००६ साली १०३, २०१० साली १६९ आणि २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात सरासरी १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. व्याघ्र रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडून व्याघ्र संरक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडण्यात येत आहे. याशिवाय वनाधिकाऱ्यांना शस्त्र परवाने, व्याघ्र प्रकल्पात वायरलेस सेट देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प
१ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
२ पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर
३ मेळघाट व्याघ्र प्रकल्प
४ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोल्हापूर
५ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
६ बोर व्याघ्र प्रकल्प

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .   
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari) 
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent 
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page 
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter 
संदर्भ :- इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब