Tuesday, August 20, 2019

श्री गजानन महाराज ( शेगाव ) Shri. Gajanan Maharaj ( Shegoan)


श्री गजानन महाराज ( शेगाव )












श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाने (लेखकाने शेगावात राहून आठ वर्षांच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले, असे समजते) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे.
इ.स. २००३ मध्ये ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाची १२९ वर्षे वय आहे असे सांगणार्‍या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री भेट झाली, त्यावेळी सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी गजानन महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. शिवानंद सरस्वती हे तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्लीहून आल्याचे लेखकाने लिहिले आहे. तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतरही शिवानंद सरस्वती २५-३० वेळा त्यांना भेटावयास आले होते. अशा प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्रीयुत खापर्डे ह्यांच्या घरी राहत. शिवानंद सरस्वतींचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे.
कालांतराने शिवानंद सरस्वती तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाहीत. हा सर्व तपशील ’गजानन महाराज चरित्र कोश’ या दासभार्गव-लिखित ग्र्ण्थात पृष्ठ ३६२-३६५ दरम्यान आला आहे. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे, हे सत्य असावे.
माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी १८ वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"
बंकटलाल आगरवाल ह्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत असे बंकटलालला वाटले आणि त्याने त्यांना स्वगृही आणले.
गजानन महाराज हे फार मोठे संत आहेत अशी भावना मनी धरणार्‍या भक्तांनी बंकटलालाचे घर दुमदुमून गेले. काही महिने गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून हटवून गावातील मारुतीच्या मंदिरात आणले.

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

शरीरयष्टी

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..

अन्नसेवन

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.
महाराजांना झुणका भाकरीसोबतच  मुळ्याच्या शेंगाहिरव्यामिरच्या ,  पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.

भक्तगण

हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलीक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. बंकटलालाच्या घरून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.

हरी पाटील - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ती रांगडी होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ती होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगांवात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि धनशक्तीने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धनसंपत्ती, गिरण्या पेढ्या व दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तीत तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टामस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळू असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व ताकद वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्या दिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधीची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधीकरिता ती जागा निवडली आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराज एकदा हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वतःच स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्याला माहिती दिली. महाराजांच्या समाधिनंतर हरी पाटलांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, म्हणूनच "श्री गजानन विजय" ह्या पोथीमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोमध्येसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावर शोककळा दिसून येते. महाराजांच्या समाधिनंतर त्यांनी काही वर्षांतच म्हणजे १९१७ साली देह विसर्जित केला.

बाळाभाऊ प्रभु - महाराजांच्या आवडत्या भक्तगणांमधील एक. बाळापुरातील आत्माराम भिकाजी ह्यांचा भाचा म्हणजेच महाराजांचे परमभक्त श्री बाळाभाऊ प्रभु होत. "उपास्यापदी भाव उपासके ठेवावा" ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे उपास्य दैवत म्हणून गजानन महाराजांचे चरणी पूर्ण श्रद्धाभाव अर्पण केला व ते मुंबई व तेथील त्यांच्या समस्त कुटुंबीयांना सोडून कायमचेच सद्‌गुरूंच्या चरणी सेवेस सादर झाले. स्वतः महाराजांनी त्यांचा भक्तिभाव शुद्ध असल्याचे शाबीत करून भास्कर पाटील ह्याचा संशय दूर केला आणि बाळाभाऊंना स्वत़:च्या अंतरंगातील एकनिष्ठ भक्ताची जागा दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी स्वतः बाळाभाऊंचा हात धरून त्यांना स्वतःच्या गादीवर बसविले. महाराजांच्या समाधिनंतर, ज्या जागी बसून महाराजांनी संजीवन समाधि घेतली त्याच जागेवर बसून ते श्रीमद्भगवद्गीतेवर प्रवचने करीत असत, त्यावेळी देहभान हरपल्याने त्यांना देहावरील वस्त्राचेदेखिल भान राहात नसे. परंतु बाळाभाऊ हे महाराजांचे सच्चे भक्त असल्याकारणाने महाराजांच्या समाधीनंतर त्यांना ह्या भौतिक जगात आनंद वाटेना, त्यामुळे ते हळूहळू खंगू लागले आणि १९१२ साली त्यांनी कृश होऊन देह सोडला.

पितांबर - शेगांवीचाच रहिवासी असलेला पितांबर हा महाराजांचा अत्यंत प्रेमळ, भोळा आणि कपटरहित अशा मनाचा भाविक भक्त होता. बंकटलालाने सांगितलेल्या महाराजांच्या थोरवीवर त्याचा चट्कन विश्वास बसला. इथेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतिची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जुन्या शिवमंदिरात जेव्हा टाकळीकरांचे कीर्तन होते त्यावेळी अचानक महाराजांची भेट होऊन त्याचा विश्वास अधिकच गाढ झाला. महाराजांचे सदैव ध्यान आणि नामस्मरण ह्याची फलश्रुति म्हणूनच की काय एकदा महाराजांची त्याच्यावर कृपा झाली आणि परिणामी महाराजांनी त्यास पर्यटनाला जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोलीच्या शिवारातील वठलेल्या आंब्याला जेव्हा पितांबराच्या सद्गुरुभक्तीच्या प्रभावाने सर्वांदेखत हिरवी पाने फुटली तेव्हा मात्र सर्वांना त्याच्या थोरवीचा प्रत्यय आला. अजूनही अकोलीत पितांबराचा मठ आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने पल्लवित झालेला आंबा अजूनही तसाच हिरवागार असून त्यास इतर आंब्यांच्या झाडांपेक्षा जास्ती फळे येतात. पितांबराचा अंतदेखील अकोलीतच झाला. पितांबराच्या जीवनाचा आढावा घेता असे दिसून येते की सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या श्रेष्ठ गुरुभक्तीचे मुख्य लक्षण होते.

श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे मॅट्रिकनंतर इंटरला नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवीत असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी वाचले. आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगांवला थांबून महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाई येई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहुमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशीर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले गेले.

त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली तेव्हा कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगांवला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगांवला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रद्धा जडली. त्या क्षणापासून् भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करून घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, अंबाडीची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेवून घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगांवच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करू शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे."

बंकटलाल अगरवाल - पातुरकरांच्या घरामधील भेटीनंतर महाराज तेथून वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तोवर बंकटलालाने वाटेमध्ये भेटलेल्या पितांबरासारख्या भोळ्याभाबड्या मित्राला महाराजांच्या थोरवीची कहाणी ऐकविल्याने तोही महाराजांना भेटावयाला उत्सुक आला होता. तो प्रसंग होता टाकळीकरांच्या कीर्तनाचा. भागवताच्या एकादश स्कंधातील ज्या श्लोकाचा पूर्वभाग कीर्तनकार बोलले त्याचा उत्तरार्ध महाराज दूर लिंबाच्या झाडाखाली बसून उच्चारते झाले; कीर्तनकारबुवा थक्कच झाले. त्यानंतर बंकटलाल मोठ्या सन्मानाने महाराजांना स्वगृही घेऊन गेला व त्यांना मोठ्या प्रेमादराने त्यांना तेथे ठेवून घेतले. परंतु महाराज स्वतः सच्चे परमहंस संन्यासी असल्याकारणाने काही कालावधीनंतर त्यांनी बंकटलालाचे घर सोडून दिले व ते गावातील मारुतीच्या मंदिरात विसावले. महाराजांच्या समाधीनंतर जेव्हा समाधीसमोर अनेक धार्मिक कार्यक्रम झाले त्यांत बंकटलालाच्या सुपुत्राने केलेला शतचंडीचे अनुष्ठान अथवा यज्ञ प्रख्यात झाला. त्या समयी बंकटलालाचा देहान्त होण्याचा प्रसंग उद्भवल्याने सर्वच चिंतीत झालेले पाहून बंकटलालाने सर्वांना सांगितले, "अरे, माझा तारक समाधीमध्ये बसला असताना तुम्ही कशाला काळजी करता!" त्यांच्या भक्तीनुसार त्यांच्या जिवावरचे संकट टळले आणि यज्ञसांग झाला. बंकटलालाचे सदन आजही शेगांवला पहावयास मिळते; सर्व भक्त्तांनी ते अवश्य जाऊन पहावे.

विरक्ति

देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती .
महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत . पादुका , पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत . बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत . मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या . इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती . क्वाचितच ते चिलीम ओढीत असत . पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला .

भ्रमंती

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.

समाधि

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्याआज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविलासंदर्भ हवा ]. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||" लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नानघालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.
त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीरगुलालफुलेतुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||," आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. {POV} त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना "अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!" असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, "अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||" सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे.
त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.
०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगावयेथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

अंतिम संदेश

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||." याव‍रून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले, "दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||." देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

+ + दूपारच्या आरती नंतर मंदिरात पिठलं भाकरी , कांदा व मिरची असा प्रसाद भक्तांना दिला जातो याचा अवश्य लाभ घ्यावा .

टिप : - शेगाव जवळच आनंद सागर हे ठिकाण पण खुप सुंदर आहे .

निवास

शेगाव येथे अत्यंत सुंदर भक्त निवास आहे . तसेच खाजगी लॉज व हॉटेल्स पण आहेत .
जाण्याचा योग्य कालावधी :
प्रचंड उन्हाळ्याचे दिवस टाळून वर्षभर कधि हि .

कसे जाल?

शेगाव रस्तेमार्गाने देशातील मोठ्या शहरांशी जोडले आहे .
रेल्वेने जाणाऱ्यांसाठी शेगाव येथे रेल्वे स्टेशन आहे .
शेगाव येथे जाण्यासाठी जवळचा विमानतळ नागपूर येथे आहे .

शेगावची गुगल पिन .

Shegaon
Maharashtra 444203
https://maps.app.goo.gl/vGDN5YYSha9WYDuc8

शेगावचे गजानन महाराज यांच्या जिवनावर आधारीत चित्रपट ( युट्युब )

https://youtu.be/qdmpApdZ62Y

आनंद सागर चे वर्णन करणारा मुट्युब व्हिडिओ

https://youtu.be/mlvV8Dh2omM

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975
संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब

No comments:

Post a Comment