Friday, August 23, 2019

श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) Tulajapur


श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)








महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

मूळ नाव चिंचपूर

तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. देवीच्या गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात – श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे.

साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही. 
श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्याव्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही.
भगताकडून सांगितलेल्या माहितीनुसार तुळजापूरची मूळ मूर्ती ही शालिवाहन म्हणजे सातवाहन कालखंडातील आहे. सातवाहनांची राजधानी पैठण ही असून त्या ठिकाणच्या राजकीय उलथापालथीमुळे या घराण्यातील शंभूराजाने ही मूर्ती अंधेरी नगरी येथे आणून तिची प्रतिष्ठापना केली. पुढे या घराण्यातील तेलंगा नावाचा राजा पराक्रमी असून तो देवीभक्त होता. अंधेरी नगरी परिसरातही आता यवनांचे आक्रमण व्हायला लागल्यानंतर स्वारीवर जाताना तेलंगाने देवीची मूर्ती आपल्यासोबत ठेवली. एकदा तो दक्षिणेत स्वारीवर असताना त्याचा मुक्काम यमुनाचल प्रांतातील चिंचपूर (तुळजापूर) येथे पडला. दुर्दैवाने याच ठिकाणी राजा तेलंगाचे निधन झाले. त्यामुळे ही मूर्ती तुळजापुरातच राहिली. आजही शुक्रवार पेठेतील जनकोजीच्या समाधीच्या बाजूला तेलंगा राजाची समाधी आहे. तेलंगा राजानंतर अंधेरी नगरीचा देवीचा भक्त जनकोजी देवकर तेली (सध्याचे भगत). पुढे बहामनी कालखंडात याच जनकोजीने देवीची मूर्ती अंधेरी नगरीला आणली. परंतु बहामनी राजवटीतून निर्माण झालेल्या अहमदनगरच्या निजामापासून त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर परत ही मूर्ती तुळजापूरला आणण्यात आली. 

या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

तुळजाभवानी ही महिषमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो.

बालाघाट डोंगररांगातील प्राचीन काळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं.
तुळजापुरातील विविध प्रथा व त्यांचे मानकरी
तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं. 

वर्षांतून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपविली जाते. तर सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगांव गोर माळय़ाच्या लोकांचा आहे.

याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती.

तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. 
निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबे गाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो. छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलं जातं. याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे.
देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशा मोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात. त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे.

लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडून येतो. देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो. 

तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचे काम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात.

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत. 

तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलत जाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.

***आता जगातून कधी हि घ्या तुळजाभवानीचे थेट दर्शन

https://osmanabad.gov.in/shri-tuljabhavani-tuljapur-live-darshan/

तुळजापुरास केव्हा जावे .

तुळजापुरास जाण्यास कुठलाहि दिवस त्याज्य नाहि . भाविकाच्या मनात आले की मग कधि हि जाता येते . नवरात्र , दिवाळी , मंगळवार व शुक्रवारास येथे खास महत्त्व आहे . ज्यांची तुळजाभवानी कुलदैवी आहे ते लग्नाआधी लग्नपत्रिका ठेवण्यास व लग्नानंतर नवदांपत्यासह देवीच्या दर्शनास जाण्याची प्रथा आहे .

निवास व कुळोपचार

परंपरागत पद्धती नुसार बरेच जण त्यांच्या कुलाचे कार्य करणा या पुजाऱ्याच्या घरी च  रहाणे पसंत करतात . त्यामुळे त्यांना त्या घरात कुलपरंपरे नुसार देवीचा नैवेद्य तयार करून मिळतो . तसेच अनेक घराण्यात तुळजापुराला गेल्या वर जागरण - गोंधळ घालण्याची प्रथा आहे . पुजाऱ्यांच्या घरात याची चांगली सोय होते हा पण एक फायदा आहे .
अवांतर जाणाऱ्यांसाठी तुळजापुरात अनेक भक्तनिवास , लॉज व हॉटेल्स आहेत .

तुळजापुरातील इतर महत्त्वाची ठिकाणे .

घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, मंकावती तिर्थ , गरीब नाथ मठ, काळभैरव मंदिर , रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

तुळजापुरास कसे जावे .

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. 
उस्मानाबाद – तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

तुळजापुरास जाण्यास सोईची आंतरराष्ट्रिय विमानतळे पुणे व मुंबई आहेत .

तुळजापुराची गुगल पिन

Tuljapur
Maharashtra 413601

https://maps.app.goo.gl/t4uarY8Nn5Cq85TGA

तुळजापुराबाबत माहिती सांगणारा युट्युब

https://youtu.be/JlWeLziEByw

विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .


Visit our Facebook page
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेटवरील विविध लेख , गुगल मॅप व यु ट्युब,

फोटो: - इंटरनेटवर उपलब्ध विविध व्यक्तींने काढलेले फोटो व तुळजापुर संस्थानच्या वेबसाईट वरील फोटो .

No comments:

Post a Comment